मला वाचवा…’ आईची ती आर्त हाक काळीज चिरून गेली; काही तासांत आई-बाळाचा दुर्दैवी अंत रीवा येथील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक घटना; कुटुंबीयांचा हलगर्जीपणाचा आरोप, चौकशी सुरू

मला वाचवा… मला इथून घेऊन चला… मला भीती वाटते…

छावा डिजिटल न्युज मीडिया | रीवा | २९ ऑगस्ट २०२६

रुग्णालयाच्या परिसरात एका आईचा हा आक्रोश ऐकू आला आणि काही तासांतच त्या आईसह तिच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील रीवा येथील संजय गांधी मेमोरियल शासकीय रुग्णालयातील या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे.बाळाला जन्म देण्यासाठी

रुग्णालयात गेली… पण परत आलीच नाही.

रीवा जिल्ह्यातील २५ वर्षीय कल्पना मिश्रा यांना प्रसूतीसाठी संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २६ ऑगस्ट रोजी त्यांची प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळाचा जन्म झाला; मात्र त्यानंतर आई आणि नवजात बाळाची प्रकृती गंभीर झाली आणि दोघांचाही मृत्यू झाला. एका घरात त्या दिवशी बाळाच्या आगमनाची तयारी असणार होती… पण काही तासांतच पाळण्यात येणारा जीव आणि त्याला जन्म देणारी आई दोघेही कायमचे निघून गेले. मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ पाहून काळीज पिळवटते..या घटनेनंतर कल्पना यांचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्या घाबरलेल्या अवस्थेत कुटुंबीयांकडे मदतीची मागणी करताना दिसत आहेत. त्यांना रुग्णालयातून घेऊन जाण्याची विनंती करत असल्याचे वृत्त आहे. मला वाचवा…ही दोन-तीन शब्दांची हाक आता हजारो लोकांच्या काळजाला भिडत आहे. कारण त्या क्षणी ती महिला केवळ रुग्ण नव्हती… ती कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी पत्नी होती आणि आपल्या बाळासाठी आई होण्याची स्वप्ने घेऊन रुग्णालयात आली होती. कुटुंबीयांचा संताप; रुग्णालयाबाहेर आंदोलन कल्पना आणि नवजात बाळाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत त्यांनी रुग्णालयाच्या गेटबाहेर आंदोलन केले आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. मात्र नेमकी चूक कुठे झाली, उपचारादरम्यान काय घडले आणि मृत्यूचे कारण काय होते, याचा तपास सध्या सुरू आहे. दोन नर्स निलंबित; पुढे चौकशीचा फास कुणावर? प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने ड्युटीवर असलेल्या दोन नर्सिंग अधिकाऱ्यांना निलंबित केले आणि चौकशी समिती स्थापन केली. त्यानंतर दोन डॉक्टरांसह एकूण चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील अधिकृत चौकशी अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. काही अहवालांमध्ये रक्ताची व्यवस्था, भूल आणि उपचारातील इतर बाबींचाही तपास केला जात असल्याचे नमूद आहे. मात्र यापैकी कोणती बाब मृत्यूला कारणीभूत ठरली, हे अद्याप अंतिमरीत्या स्पष्ट झालेले नाही. प्रश्न फक्त रीव्यातील कल्पनाचा नाही… आज आपण म्हणू शकतो, “घटना मध्य प्रदेशात घडली पण उद्या? असा प्रसंग कोणावरही येऊ शकतो… कुठेही येऊ शकतो..आपण आपल्या आईला, बहिणीला, पत्नीला किंवा मुलीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो, तेव्हा आपला एकच विश्वास असतो “डॉक्टर आणि रुग्णालय माझ्या माणसाला वाचवतील.” हा विश्वासच रुग्णालय व्यवस्थेची खरी ताकद आहे. म्हणूनच एखाद्या रुग्णाची अवस्था गंभीर असेल, तो घाबरलेला असेल किंवा तो मदतीसाठी आवाज देत असेल, तर त्या आवाजाकडे संवेदनशीलतेने पाहणे ही केवळ वैद्यकीय जबाबदारी नाही… ती माणुसकीची जबाबदारी आहे. त्या आईची शेवटची हाक विसरू नका… कल्पना मिश्रा आता या जगात नाहीत.त्यांच्या कुशीत आलेला नवजात जीवही नाही.पण मृत्यूपूर्वी त्यांनी केलेली “मला वाचवा…” ही हाक मात्र मागे राहिली आहे. ती हाक एका कुटुंबाची नाही…ती प्रत्येक रुग्णाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.या घटनेत नेमका दोष कुणाचा हे चौकशी अहवालातून स्पष्ट होईल. दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे; आणि जर कुणाची चूक नसेल तर सत्यही तितक्याच स्पष्टपणे जनतेसमोर आले पाहिजे.पण एक गोष्ट मात्र नक्की. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या माणसाचा जीव हा आकडा नसतो.तो कुणाच्या तरी घराचा श्वास असतो.आणि म्हणूनच… “मला वाचवा…” अशी एका आईची आर्त हाक पुन्हा कुठल्याही रुग्णालयाच्या भिंतीत अडकून राहू नये, एवढीच अपेक्षा.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *