संपादकीय – मुंबई ते माणगाव थरार! एका फोन कॉलनंतर बेपत्ता झालेली निधी… दोन दिवसांनी जंगलात सापडला मृतदेह; आरोपी अटकेत, पण गूढ अजूनही कायम
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ०१ जून २०२६
जंगलातील त्या भयावह दृश्याने तपास यंत्रणेलाही हादरा बसला. मृतदेहाची पाहणी करताना गळ्यावर आढळलेल्या खुणांनी पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. प्राथमिक तपास आणि शवविच्छेदनातील सुरुवातीच्या निरीक्षणांनुसार गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर शरीरावर इतर जखमांच्याही खुणा आढळल्याने हा प्रकार अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू नसून क्रूर हत्येचा असल्याचे स्पष्ट होत गेले. मात्र या मृत्यूमागील नेमकी घटनाक्रमाची साखळी काय होती, मृत्यू कसा घडवून आणला गेला आणि त्यामागचा हेतू काय होता, याचा उलगडा अंतिम फॉरेन्सिक अहवालानंतरच होणार आहे. तरीही एका १५ वर्षीय निष्पाप मुलीचा मृतदेह जंगलात सापडणे आणि गळा आवळून हत्येचा संशय समोर येणे, ही बाबच संपूर्ण रायगडच्या काळजात धडकी भरवणारी ठरली आहे.
त्या रात्री माणगाव झोपलं होतं…घरोशीवाडीच्या घराघरांत दिवे बंद झाले होते…उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे गावात चैतन्य होतं…मुंबईहून आलेली मुलं गावच्या मोकळ्या वातावरणाचा आनंद घेत होती… आणि त्याच वेळी काळोखात एक अशी घटना आकार घेत होती, जी पुढील काही दिवसांत संपूर्ण रायगड हादरवून टाकणार होती. अवघ्या १५ वर्षांची निधी उतेकर…नुकतीच नववी उत्तीर्ण झालेली…भविष्यात मोठी स्वप्नं पाहणारी…आई-वडिलांच्या डोळ्यांतील तारा…मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून सुट्ट्यांसाठी गावी आलेली…पण कोणाला माहिती होतं की या सुट्ट्या तिच्या आयुष्याच्या शेवटच्या ठरणार आहेत?२५ मेची ती रात्र…निधी घराबाहेर पडते…घरचे वाट पाहतात…वेळ पुढे सरकतो…फोन लागत नाही…रात्र जाते…सकाळ होते…दिवस संपतो…पण निधी परत येत नाही.एका आईच्या मनात भीती निर्माण होते. एका वडिलांच्या छातीत धडधड वाढते. संपूर्ण कुटुंब गावभर शोध घेतं.नातेवाईक धावतात.गावकरी शोधमोहीम राबवतात. पण निधीचा काहीच पत्ता लागत नाही. आणि मग… २७ मेची सकाळ उगवते. घरोशीवाडीच्या जंगलातून एक बातमी येते. जंगलात एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळते. पोलिस घटनास्थळी पोहोचतात. कुटुंबीयांना बोलावलं जातं. आणि काही क्षणांत एका वडिलांच्या आयुष्याचा आधार कायमचा कोसळतो. तो मृतदेह निधीचाच असतो. त्या क्षणी फक्त एक मुलगी मृत नव्हती… एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. जंगलातील शांततेआड दडलेलं भय निर्जन जंगल… आसपास शांतता… आणि त्या शांततेच्या मध्यभागी पडलेला एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह. पोलिसांनी तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथक आलं. श्वान पथक दाखल झालं. घटनास्थळ सील करण्यात आलं. शरीरावरील जखमांचे निशाण पाहून हत्या झाल्याचा संशय अधिक गडद झाला. तपास अधिक वेगाने सुरू झाला. मात्र सुरुवातीला पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. गुन्हेगार कोण? मोटिव्ह काय? आणि सर्वात महत्त्वाचं… त्या रात्री नेमकं घडलं काय? एका फोन कॉलने तपासाला दिली दिशा तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली. निधी घराबाहेर पडण्यापूर्वी कोणाशी संपर्कात होती? तिने शेवटचं कोणाशी बोललं होतं? याच तपासात एक महत्त्वाचा धागा समोर आला. शेवटच्या कॉलच्या आधारे संशयाची सुई एका व्यक्तीकडे वळू लागली. तांत्रिक तपास, लोकेशन, कॉल डिटेल्स आणि हालचालींची सांगड घालत पोलिस मुंबईपर्यंत पोहोचले. आणि मग… अवघ्या २४ तासांत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.आरोपी अटकेत… पण सत्य अजूनही पूर्ण बाहेर आलं आहे का? आज आरोपी अटकेत आहे. पोलिस चौकशी करत आहेत. फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. पण रायगडमधील लोकांच्या मनात अजूनही एक प्रश्न जिवंत आहे. निधीचा जीव नेमका का गेला? एका १५ वर्षांच्या मुलीला मृत्यूच्या दारात का ढकललं गेलं? त्या रात्री फोनवर नेमकं काय बोलणं झालं? खुनामागचा हेतू काय होता? या प्रश्नांची उत्तरं अजूनही अंधारात आहेत. आणि हीच गोष्ट लोकांना सर्वाधिक अस्वस्थ करत आहे. रायगडच्या लेकी अजूनही सुरक्षित नाहीत! ही ओळ लिहितानाही मन सुन्न होतं. पण वास्तव नाकारून चालणार नाही. प्रत्येक वेळी अशी घटना घडते. संताप व्यक्त होतो. मोर्चे निघतात. पोस्ट व्हायरल होतात. पण काही दिवसांनी सर्व काही शांत होतं. आणि मग पुन्हा एखादी निधी… पुन्हा एखादं उद्ध्वस्त कुटुंब… पुन्हा तेच अश्रू… पुन्हा तीच हेडलाईन. आज रायगडमधील अनेक पालकांच्या मनात भीती आहे. मुलगी घरी परत येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला असतो. फोन लागला नाही की हृदयाचे ठोके वाढतात. कारण काळ बदललाय. धोका आता फक्त अंधाऱ्या रस्त्यावर उभा नसतो. तो कधी कधी ओळखीच्या चेहऱ्यामागेही लपलेला असतो. छत्रपतींच्या रायगडला हा प्रश्न शोभतो का? हा तोच रायगड आहे… जिथे स्त्रीसन्मानासाठी तलवारी उपसल्या गेल्या. हा तोच रायगड आहे… जिथे महिलांच्या सुरक्षेला राज्याचा मान दिला गेला. मग आज त्याच भूमीत एका शाळकरी मुलीचा मृतदेह जंगलात सापडतो… आणि आपण फक्त बातमी वाचून पुढे जातो? ही केवळ एका गुन्ह्याची कथा नाही. ही समाजाच्या संवेदनशीलतेची परीक्षा आहे.
छावाचा थेट सवाल
आरोपी अटकेत आहे. तपास सुरू आहे. न्यायालय निर्णय देईल. पण एका आईच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार? एका वडिलांच्या छातीत जळणारी वेदना कोण शांत करणार? आणि सर्वात मोठा प्रश्न… आणखी किती निधींचे बळी गेल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने जागे होणार आहोत? आज रायगडची एकच मागणी आहे निधीला न्याय मिळालाच पाहिजे! दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, आणि रायगडच्या प्रत्येक लेकीला भीती नव्हे, तर सुरक्षित भविष्य मिळालं पाहिजे!कारण… एका निष्पाप लेकरीच्या मृत्यूची ही फक्त बातमी नाही…हा संपूर्ण समाजाच्या अंतरात्म्याला विचारलेला रक्तबंबाळ प्रश्न आहे.
![]()

