रविवार विशेष — महागाईचा भडका सणासुदीच्या उंबरठ्यावर किराणा महागलाच; कांदा, साखर, खाद्यतेल, डाळी, मसाले, पावट्यापासून पेट्रोलपर्यंत सर्वसामान्यांच्या खिशाला चटका
रविवार विशेष | सणासुदीची महागाई | सचिन मयेकर — छावा डिजिटल न्युज मीडिया
सण म्हटला की घरात आनंदाची लगबग सुरू होते, अंगण स्वच्छ होते, घर सजते, देवघरात तयारी सुरू होते, मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतो, बाजारात खरेदीची गर्दी वाढते आणि चुलीवरून दरवळणाऱ्या पदार्थांच्या सुगंधाने घराला सणाचे रूप येते; मात्र यंदा या आनंदाच्या उंबरठ्यावरच महागाईने सामान्य कुटुंबाच्या घरखर्चाचे गणित पुन्हा एकदा विस्कटल्याचे चित्र आहे. रक्षाबंधन नुकतेच पार पडले असून जन्माष्टमी आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे, त्यामुळे पुढील काही दिवसांत घराघरांत किराणा, भाजीपाला, नैवेद्याचे साहित्य आणि सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी वाढणार आहे; पण खरेदीची यादी वाढत असताना उत्पन्न मात्र त्याच वेगाने वाढत नसल्याने सर्वसामान्यांसमोर सण साजरा करण्याचेही आर्थिक गणित उभे ठाकले आहे.
कांदा महागला की रोजच्या भाजीवर परिणाम होतो, साखरेच्या दरात चढ-उतार झाला की गोडधोडाचा खर्च बदलतो, खाद्यतेल महागले की स्वयंपाकघराचा संपूर्ण खर्च वाढतो, डाळी आणि कडधान्यांच्या किमती वाढल्या की रोजच्या ताटाचे गणित बिघडते, मसाल्यांचे दर वाढले की साध्या स्वयंपाकाची किंमतही वाढते आणि वेलचीसारख्या छोट्याशा वस्तूचा भावही सणासुदीच्या पदार्थात जपून वापरण्याची वेळ आणतो; म्हणजे महागाई आता केवळ एका वस्तूपुरती राहिलेली नसून घराच्या किराणा यादीतील प्रत्येक ओळ तपासायला लावणारी परिस्थिती बनत चालली आहे.
गृहिणी बाजारात जाते तेव्हा तिच्या हातात वस्तूंची यादी असते, पण त्या यादीतील प्रत्येक वस्तू घेताना तिच्या मनात घरखर्चाचा हिशोब सुरू असतो; कांदा घ्यायचा आहे, तेल घ्यायचे आहे, साखर घ्यायची आहे, डाळ घ्यायची आहे, मसाले घ्यायचे आहेत, सर्वांसाठी व मुलांसाठी कपडे घ्यायचे आहे, देवाच्या नैवेद्यासाठी साहित्य घ्यायचे आहे आणि सणासाठी घरात थोडे गोडधोड करायचे आहे, पण या सगळ्यानंतर महिन्याचा उर्वरित खर्च कसा भागवायचा, हा प्रश्नही तिच्यासमोर असतो.
महागाईची खरी झळ बाजारातील मोठमोठ्या आकडेवारीत दिसत नाही, ती गृहिणीच्या किराणा पिशवीत व कपड्याच्या पिशवीत दिसते; ती महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिसते; ती पगार संपण्यापूर्वी संपणाऱ्या पैशांत दिसते आणि ती मुलांसाठी एखादी वस्तू घेताना स्वतःची गरज पुढे ढकलणाऱ्या आईच्या निर्णयात दिसते.
सणासुदीचा काळ म्हणजे विशेषतः घरगुती स्वयंपाकाचा काळ; पाहुणे येतात, नातेवाईक भेटतात, देवासाठी नैवेद्य केला जातो, मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात आणि घरच्या परंपरेनुसार अनेक पदार्थ केले जातात. कोकणातील अनेक घरांत गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पावट्याचे बिरडं करण्याची परंपरा आहे; पावट्याचे बिरडं हा फक्त एक पदार्थ नाही, तर घरची चव, आई-आजीच्या हातची आठवण आणि पिढ्यान्पिढ्या जपलेली परंपरा आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी चुलीवर बिरडं शिजत असताना घरात पसरलेला सुगंध आणि नैवेद्य दाखवताना कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हे पैशांनी विकत घेता येत नाही; मात्र त्या परंपरेसाठी लागणाऱ्या किराण्याच्या किमती वाढल्या की गृहिणीला त्या पदार्थाचा खर्चही मोजावा लागतो, ही आजच्या महागाईची वस्तुस्थिती आहे.
सणाचा गोडवा साखरेपासून सुरू होतो आणि स्वयंपाकाची फोडणी तेलापासून; त्यामुळे साखर आणि खाद्यतेल या दोन्हींच्या किमतीतील बदलाचा थेट परिणाम घरच्या बजेटवर होतो. शिरा, खीर, लाडू, मोदक, नैवेद्याचे पदार्थ असोत किंवा रोजचा साधा स्वयंपाक असो, प्रत्येक ठिकाणी खर्च वाढताना जाणवतो; त्यात डाळी-कडधान्ये, मसाले, नारळ आणि इतर किराणा वस्तूंची भर पडली की सणासाठी वेगळे बजेट काढणे सामान्य कुटुंबासाठी अधिक कठीण होते.
आणि या सगळ्याबरोबर रोजच्या जीवनाचा आणखी एक खर्च म्हणजे पेट्रोल; नोकरीसाठी प्रवास असो, व्यवसायासाठी धावपळ असो, मुलांना शाळेत सोडणे असो किंवा सणाच्या खरेदीसाठी बाजारात जाणे असो, इंधन हा आजच्या जीवनातील आवश्यक खर्च आहे. त्यामुळे महागाईचा परिणाम फक्त स्वयंपाकघरातील ताटावर होत नाही, तर घरातून बाजारापर्यंतच्या प्रत्येक प्रवासावरही त्याची सावली पडते.
मात्र या संपूर्ण परिस्थितीकडे पाहताना प्रत्येक दरवाढीसाठी किराणा दुकानदाराला देणे योग्य ठरणार नाही; बाजारातील आवक, उत्पादन, मागणी-पुरवठा, वाहतूक, आयात, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि इतर अनेक कारणांमुळे वस्तूंचे दर बदलत असतात आणि दुकानदारालाही माल ज्या दराने मिळतो त्यानुसार व्यवसाय करावा लागतो; त्यामुळे प्रश्न एखाद्या दुकानाचा नसून संपूर्ण बाजारव्यवस्थेचा आणि त्या व्यवस्थेचा भार सहन करणाऱ्या ग्राहकाचा आहे.
शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा योग्य भाव मिळायलाच हवा, उत्पादकाला न्याय मिळायला हवा, व्यापाऱ्यालाही व्यवसायातून योग्य मोबदला मिळायला हवा; पण त्याचवेळी सामान्य ग्राहकाला जीवनावश्यक वस्तू परवडणाऱ्या दरात मिळणेही तितकेच आवश्यक आहे. कारण सामान्य माणूस सणासाठी खरेदी करतो तेव्हा तो श्रीमंती दाखवण्यासाठी बाजारात जात नाही; तो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी आणि आपल्या श्रद्धेसाठी खरेदी करतो.
श्रीमंत कुटुंबासाठी एखाद्या वस्तूच्या किमतीत झालेली वाढ कदाचित फार मोठी अडचण ठरणार नाही; पण रोजच्या उत्पन्नातून घर चालवणाऱ्या कुटुंबासाठी प्रत्येक रुपयाला किंमत असते. आई स्वतःची एखादी गरज पुढे ढकलते, वडील मुलांसाठी पैसे बाजूला ठेवतात, घरातील सणाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न होतो आणि तरीही मनात एकच इच्छा असते मुलांचा सण आनंदात जावा, घरात देवाचा नैवेद्य व्हावा आणि आपल्या माणसांनी दोन घास आनंदाने खावेत.
म्हणूनच आजचा प्रश्न केवळ कांदा कितीला, तेल कितीला, साखर कितीला किंवा डाळ कितीला, एवढाच नाही; प्रश्न असा आहे की उत्पन्नाच्या तुलनेत घरखर्च किती वाढतोय आणि सामान्य माणसाच्या हातात महिन्याच्या शेवटी किती पैसे उरतात?
सामान्य माणूस आपल्या कष्टाच्या पैशातून सण साजरा करतो, आपल्या घामाच्या कमाईतून घरात गणपती आणतो, मुलांसाठी कपडे घेतो, पाहुण्यांसाठी चहा करतो, नैवेद्य बनवतो आणि आपल्या परीने आनंद निर्माण करतो; पण जर प्रत्येक सणाच्या आधी किराणा यादीकडे पाहताना त्याला खर्चाची चिंता वाटत असेल, तर ही केवळ वैयक्तिक अडचण नसून समाजाच्या मोठ्या आर्थिक वास्तवाकडे पाहण्याची वेळ आहे.
सामान्यांच्या खिशाला चटका बसतोय, मग या वाढत्या किमतींच्या साखळीत नेमका फायदा कोणाचा वाढतोय, हा सवाल विचारणे चुकीचे नाही. हा सवाल एखाद्या व्यक्तीविरोधात नसून बाजारातील दरवाढीच्या संपूर्ण व्यवस्थेला आहे. सामान्यांच्या कष्टाच्या पैशातून बाजारात उलाढाल होते, प्रत्येक सणासुदीला खरेदी वाढते, व्यापारी व्यवहार वाढतात, व्यवसायाला चालना मिळते; पण त्या सगळ्याचा केंद्रबिंदू असलेल्या ग्राहकाच्या संसाराचे गणितही टिकले पाहिजे.
कारण सण सर्वांचा असतो. तो केवळ मोठ्या घरात येत नाही; तो कष्टकऱ्याच्या घरातही येतो, मध्यमवर्गीयाच्या छोट्याशा घरातही येतो आणि रोजच्या कमाईवर संसार चालवणाऱ्या कुटुंबाच्या दारातही तितक्याच श्रद्धेने येतो. गरीबाच्या घरातील नैवेद्य साधा असला तरी त्यातील भक्ती कमी नसते आणि मध्यमवर्गीयाच्या घरातील प्रसाद छोटा असला तरी त्यातील प्रेम कमी नसते.
गणपती बाप्पाच्या आगमनाच्या काळात घराघरांत आरास होईल, मोदक बनतील, नैवेद्य केले जातील, कोकणातील घरांत पावट्याचे बिरडं शिजेल, मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असेल आणि देवासमोर हात जोडले जातील; पण या सगळ्या आनंदाच्या मागे “या महिन्याचा खर्च कसा भागणार?” हा प्रश्न उभा राहू नये, हीच सामान्यांची अपेक्षा आहे.
सरकार आणि संबंधित यंत्रणांनी बाजारातील दर, पुरवठा, साठवणूक, आवक-जावक आणि घाऊक-किरकोळ दरातील फरकावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. महागाईची कारणे अनेक असू शकतात, पण तिचा अंतिम भार सामान्य ग्राहकाच्या खिशावर पडत असेल तर त्या ग्राहकाला दिलासा देण्यासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याला न्याय हवा, व्यापाऱ्याला न्याय हवा आणि ग्राहकालाही न्याय हवा; एका घटकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होऊ नये, हीच खरी समतोल बाजारव्यवस्था.
आज कांदा महागला म्हणून भाजी कमी होऊ नये, साखरेच्या दरामुळे सणाची गोडी कमी होऊ नये, तेलाच्या दरामुळे स्वयंपाकावर मर्यादा येऊ नयेत, डाळींच्या दरामुळे ताटातील पोषण कमी होऊ नये, मसाल्यांच्या किमतीमुळे घरच्या पदार्थांचा सुगंध हरवू नये आणि पेट्रोलच्या खर्चामुळे सणासाठी घराबाहेर पडतानाही दहा वेळा विचार करण्याची वेळ येऊ नये.
महागाईची खरी परीक्षा बाजारातील आकड्यांची नसते; ती सामान्य माणसाच्या संसाराची असते.
सणासाठी सामान्य माणूस कर्ज काढून मोठेपणा दाखवू इच्छित नाही; त्याला आपल्या कष्टाच्या पैशातून आपल्या कुटुंबाला आनंद द्यायचा असतो. त्याला मोठी मागणी नाही, त्याला फक्त एवढेच हवे की घर चालावे, मुलांच्या चेहऱ्यावर हसू राहावे, देवाचा नैवेद्य मनापासून करता यावा आणि महिन्याच्या शेवटी हातात चार पैसे उरावेत.
महागाईचा भडका कमी करा; सामान्यांच्या सणाचा आनंद वाढू द्या!
किराणा महागला म्हणून घरातील गोडवा कमी होऊ नये आणि वाढत्या खर्चामुळे बाप्पाच्या स्वागताची उमेद मावळू नये!
सामान्यांच्या खिशाला चटका देणारी महागाई कमी झाली पाहिजे; कारण सणांच्या ताटात पदार्थ कमी आणि खर्चाचे हिशोब जास्त दिसू लागले, तर उत्सवाचा खरा आनंदच हरवून जाईल.
सण हा श्रीमंतीचा प्रदर्शन नसतो; तो श्रद्धेचा, परंपरेचा आणि कुटुंबाच्या आनंदाचा उत्सव असतो. त्यामुळे महागाईच्या सावटातून सामान्यांचे घरही मुक्त झाले, तरच सण खऱ्या अर्थाने सर्वांचा राहील.
सणाच्या ताटात गोडवा राहू द्या… महागाईची कडवट चव नको!
— छावा विशेष | रविवार विशेष
![]()

