शिवरायांचा गोपाळगड आणि मालकी हक्काचा महावाद पर्यटकांना हटकले, “हा गड आमचा” म्हणत वाद; महाराष्ट्र संतप्त

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | विशेष वृत्तांकन

📅 दि. २२ जून २०२६

रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये जिंकून इतिहासात अजरामर केलेल्या या किल्ल्याभोवती आता मालकी हक्काचा वाद निर्माण झाला आहे. मे महिन्यात बदलापूर येथील काही पर्यटक आपल्या कुटुंबासह गोपाळगड पाहण्यासाठी गेले होते. किल्ल्याच्या परिसरात पडलेले काही आंबे त्यांनी उचलल्याचे सांगितले जाते. त्यावेळी काही स्थानिक व्यक्तींनी त्यांना हटकले. “हा गड आमच्या मालकीचा आहे” असे सांगत पर्यटकांशी वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर राज्यभर संताप व्यक्त होऊ लागला. प्रश्न काही आंब्यांचा नव्हता. प्रश्न होता  छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या गडावर खासगी मालकीचा दावा कसा काय केला जातो? राज्य संरक्षित स्मारक म्हणून नोंद असलेल्या गोपाळगडाच्या सातबाऱ्यावर काही खासगी व्यक्तींची नावे असल्याची बाब समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार १९६५ मध्ये लिलाव प्रक्रियेद्वारे संबंधित गट क्रमांक काही व्यक्तींना मिळाले. त्याच गट क्रमांकात किल्ल्याचा भाग समाविष्ट असल्याने हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. इतिहासाचा मागोवा घेतला तर गोपाळगड हा वाशिष्ठी नदी आणि दाभोळ खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. आदिलशाहीच्या ताब्यात असलेला हा किल्ला १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. पुढे सिद्दी, आंग्रे, पेशवे आणि ब्रिटिशांच्या ताब्यात तो गेला. मात्र स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या अभिमानाचा हा गड मालकी हक्काच्या वादात अडकला. गुहागर पंचायत समितीचे उपसभापती नीलेश सुर्वे यांनी हा किल्ला तातडीने शासनाच्या ताब्यात घ्यावा अशी मागणी केली आहे. आमदार प्रमोद जठार यांनीही या विषयाची दखल घेत जिल्हाधिकारी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, संबंधित जमीन खासगी मालकीत असली तरी २०१६ मध्ये गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य मोबदला देऊन शासन ताबा घेऊ शकते, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेला गड आज मालकी हक्काच्या वादात का अडकला? राज्य संरक्षित स्मारक असूनही संपूर्ण ताबा शासनाकडे का नाही? सातबाऱ्यावर खासगी नावे कशी आली?आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न…ज्या गडासाठी मावळ्यांनी रक्त सांडले, त्या गडावर आज सामान्य पर्यटकांना “हा गड आमचा आहे” असे ऐकावे लागणे, ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शोकांतिका नाही का?

🚩 जय शिवराय… जय महाराष्ट्र… 🚩

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *