तुफान पाऊस… चिखलमय समुद्र… तरीही भक्तांची जिद्द कायम! रेवदंड्यात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप; मुसळधार पावसातही भक्तांची माघार नाही, चिखलातून वाट काढत समुद्रात जाऊन बाप्पाचे विसर्जन

 रेवदंड्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे काल सायंकाळनंतर भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. सायंकाळी सहा वाजल्यानंतर विसर्जनाला सुरुवात झाली आणि सुरुवातीला भक्तिमय वातावरणात आरती, जयघोष आणि बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू असतानाच काही वेळातच आकाशाने अचानक आपले रौद्ररूप दाखवले. तुफान पावसाने अक्षरशः थैमान घातले आणि विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांची जणू परीक्षाच सुरू झाली.

 

मुसळधार पावसामुळे काही काळ विसर्जनाच्या ठिकाणी मोठी धावपळ झाली. अंगावर कोसळणारा पाऊस, चिखलमय परिसर आणि त्यात हातात बाप्पाची मूर्ती घेऊन उभे असलेले भक्त असे चित्र पाहायला मिळाले. मात्र पावसाचा जोर वाढला म्हणून भक्तांची श्रद्धा किंवा जिद्द काही कमी झाली नाही.

समुद्रकिनारी भक्तिभावाने आरती करण्यात आली. बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून, पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्राच्या दिशेने कुच केली.

 विसर्जनासमोर मोठे आव्हान… चिखलमय समुद्रकिनारा

यावेळी गणेशभक्तांसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे समुद्राच्या सुरुवातीच्या भागात निर्माण झालेला चिखल. पाण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने समुद्रात पाऊल टाकताच भक्तांचे पाय अक्षरशः चिखलात फसू लागले.

एक पाऊल पुढे टाकायचे तर पाय चिखलात रुतत होता, दुसरे पाऊल टाकताना तोल सांभाळावा लागत होता. हातात बाप्पाची मूर्ती, डोक्यावर पावसाचा मारा आणि खाली चिखलाचे साम्राज्य… अशा परिस्थितीत विसर्जन करणे म्हणजे भक्तांसाठी मोठे आव्हानच होते.

मात्र या अडचणीसमोर गणेशभक्तांनी माघार घेतली नाही. पाय चिखलात फसत होते, पण श्रद्धा मात्र डगमगत नव्हती. एकमेकांना आधार देत, सावधपणे पावले टाकत भक्तांनी चिखलातून वाट काढली आणि समुद्राच्या पाण्यात पुढे जात आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

 पाऊस थांबला नाही… पण भक्तीही थांबली नाही

आकाशातून मुसळधार पाऊस कोसळत होता, समुद्रकिनारी चिखलाचा सामना करावा लागत होता; तरीही भक्तांच्या मुखातून  गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष सुरूच होता.

बाप्पाला निरोप देताना अनेक भक्तांच्या डोळ्यांत भावुकता होती. दीड दिवस घरात भक्तिमय वातावरण निर्माण करणाऱ्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली  होती.

निसर्गाने परीक्षा घेतली… पावसाने अडवले… चिखलाने पाय रोखले… पण भक्तीने वाट काढली.

अखेर याच श्रद्धेच्या जोरावर रेवदंड्यातील गणेशभक्तांनी मुसळधार पावसातही आपल्या लाडक्या गणरायाला समुद्राच्या सान्निध्यात भावपूर्ण निरोप दिला.

 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *