पुणे बस जळीतकांडात नवा ट्विस्ट समोर आला आहे…

पुणे बस जळीतकांडात नवा ट्विस्ट समोर आला आहे. मास्टरमाईंड चालकाच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे हिंजवडी बस जळीतकांड (Hinjewadi Bus Fire Case) प्रकरणाला आता नवे वळण आल्याचं समोर आलं आहे.

आरोपी म्हणून अटकेत असलेल्या चालक जनार्दन हंबर्डीकर (Janardan Humbardikar) यांच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त करत मोठे आरोप केले आहेत.

कुटुंबीयांचा दावा : जनार्दन निर्दोष, जबरदस्तीने जबाब घेतला?
पुण्यात 19 मार्च रोजी आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी जनार्दनवर आग लावण्याचा कट रचल्याचा आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल केला.

पण आता जनार्दनच्या पत्नी आणि भावाने या घटनेबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. “जेव्हा जनार्दन पूर्ण शुद्धीत नव्हता, तेव्हा पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाच कसा?”, “आग लागलेल्या बसमध्ये जनार्दनचे सख्खे भाऊजी देखील होते, मग त्यांनी स्वतःच्याच नातलगाचा जीव धोक्यात कसा घातला असता?”, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

केमिकल आणताना कोणीही थांबवलं नाही का?
कुटुंबीयांनी आणखी प्रश्न उपस्थित करत सांगितलं की, “पोलिस म्हणतात की जनार्दनने आदल्या दिवशी केमिकल आणि चिंध्या बसमध्ये ठेवल्या, तर कंपनीत कुणी हे लक्षात का घेतलं नाही?, बसमधून वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटलेसुद्धा नाही, पेटत्या बसमधून ते इतक्या सहज कसे वाचले?”

जनार्दनच्या कुटुंबीयांचा ठाम दावा आहे की, त्यांच्यावर अन्याय झाला असून, सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
“जनार्दन निर्दोष असून, त्याला बळीचा बकरा बनवले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. कुटुंबीयांनी सरकारी यंत्रणांकडून न्यायाची मागणी करत संपूर्ण तपास स्वतंत्र संस्थेकडून व्हावा, अशी विनंती केली आहे. (Hinjewadi Bus Fire Case)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *