वसई | प्रतिनिधी | २३ जुलै २०२५
वसईतील कालंब बीच परिसरात एका संशयास्पद कंटेनरच्या शोधामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना काल (२२ जुलै) उघडकीस आली असून स्थानिक मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे याची माहिती वसई पोलिसांना मिळाली.
सदर कंटेनर समुद्र किनाऱ्यावर विस्कळीत स्थितीत आढळून आला. त्यावर कोणतेही स्पष्ट मार्किंग अथवा शिपिंग तपशील दिसून आले नाहीत. त्यामुळे हे कंटेनर किनाऱ्यावर कसे आले, याबाबत संशय निर्माण झाला आहे.
वसई पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बॉम्बशोध पथक, समुद्री सुरक्षा विभाग आणि स्थानिक गुप्तचर यंत्रणाही तपासात सामील झाल्या आहेत. कंटेनरमध्ये कोणताही स्फोटक पदार्थ अथवा बेकायदेशीर वस्तू आहेत का, हे तपासण्यात येत आहे.
सदर ठिकाणी यापूर्वीही एका संशयास्पद ड्रमसदृश्य वस्तू आढळली होती. त्यामुळे हा केवळ अपघाताने किनाऱ्यावर आलेला कंटेनर आहे की यामागे कोणतीतरी योजना आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता, संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असे संशयास्पद कंटेनर आढळणे ही चिंतेची बाब आहे. सुरक्षा यंत्रणांनी समुद्री सीमांची निगराणी अधिक तीव्र करण्याची गरज आहे, अन्यथा अशा घटनांमुळे संभाव्य धोके वाढू शकतात.