शिवरायांची रणश्री – भाग १ : गुलामगिरीच्या अंधारातून तेजाचा उदय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक.
हा लेख ऐतिहासिक संदर्भ आणि उपलब्ध माहितीवर आधारित असून, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला हिंदुस्थानाचा नकाशा रक्ताने भिजलेला होता.

उत्तर दिशेला मुघलांची लोखंडी बेडी, दक्षिणेत आदिलशाही-निजामशाहीची सत्ता सगळीकडे फक्त अन्याय, लूटमार, धर्मांतर आणि गुलामगिरीचे भयावह सावट.

शेतकरी कराच्या ओझ्याखाली चिरडले गेले, मंदिरांचे कळस पाडले गेले, स्त्रियांची अस्मिता लुटली जात होती.

जनतेच्या मनातील स्वाभिमान मावळला होता.

आकाश काळं-कुट्ट होतं, पण त्यात आशेचा एकही किरण नव्हता!

पण इतिहासाला नेहमीच असे क्षण लाभतात — जेव्हा अंधाराच्या गर्तेत एक तेजस्वी तारा उगवतो…

तो तारा हळूहळू सूर्य बनतो…

आणि त्याच्या ज्वाळांनी संपूर्ण युगं पेटून उठतात.

असा एक क्षण आला १९ फेब्रुवारी १६३० रोजी.

शिवनेरी किल्ल्यावर, जिजाबाईंच्या कुशीत जन्माला आलं एक बालक — शिवाजी!

या बाळाच्या डोळ्यांत पहिल्यापासूनच अपराजेय चमक होती, आणि त्या चमकात लपलेलं होतं स्वराज्याचं स्वप्न.

आई जिजाऊंनी संस्कारांनी त्याला धर्म, न्याय आणि स्वाभिमानाची शिकवण दिली. दादोजी कोंडदेवांनी शिस्त, पराक्रम आणि रणकौशल्याची ओळख करून दिली.

लहान वयातच तलवार त्याच्या हातात खेळण्यासारखी भासत होती, आणि घोडेस्वारी श्वासासारखी झाली होती.

पण शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धा नव्हते.

त्यांच्या मनात एक आगळी वेगळी विचारसरणी होती.

तो काळ होता राजेशाही आणि सरंजामशाहीचा. राजा म्हणजे देव, प्रजेवर अमर्याद हक्क असणारा अधिपती. पण शिवाजी महाराजांनी हाच समज मोडून काढला.

त्यांनी दाखवून दिलं राजा हा प्रजेचा सेवक आहे, जनतेसाठी उत्तरदायी आहे.

त्यांच्या राज्यकारभारात लोकशाहीचे धागे स्पष्ट जाणवत होते. प्रजेच्या मते, सल्ला आणि हित याला ते सदैव अग्रक्रम देत.

धार्मिक सहिष्णुता हा त्यांचा आणखी एक ठळक पैलू.

मुघल-आदिलशाहीच्या काळात धर्मांतराची लाट उसळली होती, पण शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा आदर केला.

मंदिरं वाचवली, मस्जिदींचं रक्षण केलं, आणि कोणत्याही जाती-धर्मातील प्रजेला न्याय मिळवून दिला.

त्यांच्या दरबारात मुस्लिम सरदार, किल्लेदार, सेनापती हे सन्मानाने कार्यरत होते.

त्यांनी केवळ युद्ध जिंकली नाहीत, तर मानवी मूल्यांचं रक्षण केलं.

स्वराज्य हा शब्द फक्त सत्ता नव्हे, तर जनतेचा श्वास बनला.

यासाठी किल्ल्यांची भक्कम श्रृंखला उभारली, गनिमी काव्याची तंत्रं जगासमोर आणली, आणि लोकशाहीच्या मूल्यांना प्रत्यक्ष शासनात रुजवलं.

तो फक्त एक राजा नव्हता…

तो होता प्रजेचा खरा रक्षक.

तो होता अन्यायाच्या सिंहासनाला उखडून फेकणारा योद्धा.

तो होता स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज….

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *