रायगडावर आज सिंहासन नव्हतं — भावाच्या मायेचा आसन होता (शिवाजी महाराजांची खरी भाऊबीज जिथं माणुसकीने राज्य केलं)

हा लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ऐतिहासिक संदर्भ, लोककथा आणि जनश्रुतींवर आधारलेला आहे. या लेखातील भावनिक प्रसंग लोकपरंपरेत जपले गेलेले आहेत.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर–संपादकीय गुरुवार – २३ ऑक्टोबर २०२५

रायगडाचा गड आज काही वेगळाच भासत होता. दरवाज्यावर दिव्यांची माळ उजळली होती, अंगणभर चंदनाचा गंध पसरला होता आणि आकाशात कोवळा द्वितीय चंद्र चमकत होता. गडावर ना रणशिंगाचा आवाज होता, ना तलवारींची झंकार. आज युद्ध नव्हतं  आज होता सण. पण फक्त सण नव्हता, तो होता नात्याचा, संस्कारांचा, आणि माणुसकीचा सण  भाऊबीजेचा. दरबारात सिंहासनावर बसले होते महाराष्ट्राचं मन छत्रपती शिवाजी महाराज. त्या दिवशी तो सिंहासनावर बसलेला राजा नव्हता, तो फक्त एक भाऊ होता. सोन्याची थाळी हातात घेऊन दरबारात आली सखूबाई निंबाळकर  शिवाजी महाराजांची लाडकी बहीण. कपाळावर कुंकवाचं तिलक, ओठांवर हलकं हसू आणि डोळ्यांत स्नेहाचे थेंब. महाराज सिंहासनावरून उठले आणि बहिणीसमोर नम्रतेनं उभे राहिले. सखूबाईचा आवाज थरथरला अरे शिवबा, तू आता सिंहासनावर बसलास, पण माझ्या डोळ्यांत तू अजून तोच लहान शिवबा आहेस. आरतीच्या प्रकाशात थाळी चमकत होती  फुलांच्या सुगंधात भावनांचं वादळ उसळत होतं. महाराजांनी हसत म्हटलं, सखू, रणांगणात तलवार माझं कवच असतं, पण आज तुझं प्रेम माझी ढाल आहे.बहिणीच्या डोळ्यांत अश्रू दाटले, दरबारात शांतता पसरली. त्या क्षणी सिंहासनावर बसलेला राजा नव्हता  तो आईचा शिवबा, बहिणीचा भाऊ आणि माणुसकीचा आराध्य होता. रायगडावर त्या रात्री एकही दिवा विझला नाही. प्रत्येक कोपऱ्यातून स्त्रिया, मातां, बहिणी आरती करत होत्या. महाराजांनी जाहीर केलं  आजपासून या स्वराज्यातील प्रत्येक आई माझी जिजाऊ आहे आणि प्रत्येक स्त्री माझी बहीण आहे. त्या शब्दांनी गड दणाणून गेला जय भवानी, जय शिवाजी आणि रायगडाच्या वाऱ्याने जणू सांगितलं, आज राजा नव्हता, फक्त भाऊ होता. पण महाराजांच्या आयुष्यातली खरी भाऊबीज इथेच संपली नाही. ती पुढं रणांगणावर उजळली जिथं तलवारी होत्या, पण मनात सन्मान होता. एका मोहिमेत महाराजांच्या ताब्यात एक सुंदर स्त्री आली  शत्रूच्या सरदाराची बायको. ती घाबरलेली, विव्हळलेली. सैनिकांनी तिला महाराजांसमोर उभं केलं. दरबारात काही क्षण शांतता होती. मग महाराज उठले, तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आई भीऊ नकोस. तू शत्रूची नव्हेस, तू माझ्या संस्कारांची साक्ष आहेस. मग त्यांनी तिच्या कपाळावर कुंकवाचा ठिपका लावला, ओटी भरली, वस्त्र दिलं आणि सन्मानाने पालखीत बसवून तिला सुखरूप परत पाठवलं. त्या क्षणी दरबार थरथरला. एका वृद्ध मावळ्याने डोळ्यांत पाणी आणून म्हटलं, अशीच आमची आई असती, वदले छत्रपती. हा फक्त प्रसंग नव्हता  हा होता माणुसकीचा आरतीचा क्षण. महाराजांनी रणांगणात जिंकलं होतं, पण त्या दिवशी त्यांनी जगाची माणुसकी जिंकली. शिवाजी महाराजांनी जेव्हा आई म्हटलं, तेव्हा त्यांनी भाऊबीजेचं नातं रक्तात नव्हे तर संस्कारात परिभाषित केलं. त्यांच्या भाऊबीजेत फक्त सखूबाई नव्हती, तर प्रत्येक स्त्री होती  जी कुणाचीही असो, तिचा सन्मान त्यांच्या राज्यात सर्वोच्च होता. म्हणूनच आज रायगडावरची भाऊबीज फक्त बहिणीची नव्हती  ती होती स्त्रीसन्मानाच्या संस्कारांची ओवाळणी. जिथं बहिण ओवाळते, आई आशीर्वाद देते, आणि परस्त्रीलाही सन्मान मिळतो  तीच खरी शिवाजी महाराजांची भाऊबीज. जिथं परस्त्रीलाही ‘आई’ म्हणून ओवाळलं जातं, जिथं सत्तेपेक्षा संस्कार मोठे ठरतात, आणि जिथं सिंहासनावर माणुसकी बसते  तीच खरी भाऊबीज, आणि तोच खरा राजा  छत्रपती शिवाजी महाराज…..

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *