क्राईम — रविवार विशेष — ही प्रेमकहाणी, लग्न आणि खून

अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी महाजने गाव…

भातशेती व डोंगररांगा यांनी वेढलेला शांत, निसर्गरम्य परिसर.
गाव साधं, सरळ आणि साधकबाधक जीवन जगणारं.
पण या शांततेवर आता मात्र खुनाच्या घटनेचं काळं सावट दाटून आलं आहे.

सचिन मयेकर,  ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०७ सप्टेंबर  २०२५

सन २०१८ पासून कदाचित त्याही आधीपासून
दत्ताराम नागू पिंगळा आणि अर्चना नाईक यांच्यात प्रेमसंबंध होते.
दोघांचं नातं अगदी गावातील तरुणाईला साजेसं
सरळसोट, मनापासून, खरं.

मात्र अर्चनाचे काका तुकाराम सजन्या नाईक यांनी या नात्याला तीव्र विरोध केला.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं हे लग्न कधीच होणार नाही.
दत्तारामची परिस्थिती, त्याचा तडफदार स्वभाव यामुळे काकांना तो जावई मान्य नव्हता.
आणि मग कुटुंबाने अर्चनाचं लग्न चंद्रकांत नाईक यांच्याशी करून टाकलं.

लग्न झालं… पण मनातलं प्रेम नाहीसं झालं नाही

अर्चनाने लग्न केलं, पण मनाने ती दत्तारामलाच आपलंसं मानत होती.
थोड्या काळाने तिने नवऱ्याला सोडून परत गावात यायचं ठरवलं.
ती परतली  आणि तेही फक्त दत्तारामसाठी.

इतकंच नाही तर,
दत्ताराम तुरुंगात असतानाही अर्चना त्याला भेटायला जायची.
तिच्या मनातलं प्रेम एवढं खोलवर होतं की तुरुंगाच्या भिंतींनीसुद्धा ते थांबवलं नाही.

मात्र दत्तारामच्या मनात काकांबद्दलचा राग धगधगत राहिला.
त्याला वाटत होतं की “माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्याला जबाबदार फक्त काका आहेत.”
या सूडातूनच त्याने २०१८ मध्ये काकाचा खून केला.
त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.

पण एप्रिल २०२४ मध्ये तो जामिनावर सुटला.
मनातली कटुता मात्र अजूनही शांत झालेली नव्हती.

१ सप्टेंबर २०२५ रोजी दत्ताराम आणि अर्चना एकत्र होते.
त्या दिवशी दोघंही दारूच्या नशेत होते.
किरकोळ गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला.
वाद क्षणाक्षणाला चिघळला आणि अखेर दत्ताराम भडकला.

कदाचित त्याने अर्चनाला संपवायचं मनात ठेवलं नव्हतं.
तोही तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता.
पण नशा, राग आणि तडफदार स्वभाव
या तिन्हींच्या संगमाने त्याचा ताबा सुटला.
आणि नायलॉनच्या रशीतून अर्चनाचा गळा आवळून त्याने त्या प्रेमकहाणीचा शोकांत शेवट केला.

दत्तारामचा गावात एवढा दरारा होता की
लोक त्याच्या नावानेही घाबरत होते.
तो कुठे आहे, हे पोलिसांना सांगायलाही कोणी पुढे येत नव्हतं.

मात्र पोलिसांनी हार मानली नाही.
शिताफीने हालचाली करून अखेर त्याला गाठलं आणि बेड्या ठोकल्या.
या कारवाईने गावातील भीतीचं सावट काही प्रमाणात दूर झालं.

एका बाजूला  अर्चनाचं आयुष्य संपलं, कुटुंब उद्ध्वस्त झालं.
दुसऱ्या बाजूला दत्ताराम, जो खरं प्रेम करत होता,
त्यानेच आपल्या हाताने त्या नात्याचा रक्तरंजीत शेवट केला.

प्रेम, विरोध, जबरदस्ती, राग, नशा
या सगळ्या गोष्टींच्या गोंधळातून
एक खरं नातं नष्ट झालं, दोन आयुष्यं उद्ध्वस्त झाली.

पोलिसांच्या ताब्यात आल्यावर दत्तारामचा चेहरा ताठ होता,
पण डोळ्यांमध्ये मात्र वेगळीच कहाणी उमटली होती.
त्याच्या डोळ्यांत चुकीचं पाऊल उचलल्याची केविलवाणी खंत होती…
आणि अर्चनावरच्या अपार प्रेमाच्या आठवणीने ते डोळे पाणावलेले दिसत होते.

जेव्हा दोन तरुण एकमेकांवर प्रेम करतात, तेव्हा समाजाने त्यांना का थांबवावं?

जबरदस्तीने लावलेलं लग्न खरंच कुणाचं आयुष्य सुखी करतं का?

दारू, राग आणि सूड हे तिन्ही मिळाले की नात्यांचा शेवट फक्त मृत्यूतच होतो का?

दिवीवाडी महाजनेच्या शांत परिसरात घडलेली ही घटना
फक्त खूनाची बातमी नाही.
ही एक प्रेमकहाणी आहे जी नाकारली गेली…
लग्नातून फसवली गेली…
आणि शेवटी रक्तरंजीत खूनात संपली.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *