तुम रक्षक तो काहू को डर ना जय कपिश तिहूं लोक उजागर सूर्यालाही फळ समजून झेप घेणारा रावणासमोर उभा ठाकणारा आणि संजीवनीसाठी पर्वत उचलणारा तोच अखंड शक्तीचा अवतार, आपला बजरंगबली
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, गुरुवार ०२ एप्रिल २०२६
हनुमानाच्या पराक्रमावर आधारित विविध कथां, चरित्रग्रंथ आणि भारतीय लोकपरंपरेत सांगितल्या जाणाऱ्या घटनांमधून निवडक संदर्भ घेत, स्वतःच्या शब्दांत साकारलेली ही मांडणी भाविकांच्या श्रद्धा आणि भक्तीचा अफाट संगम असलेल्या श्री हनुमानांचा हा लेख ‘छावा’च्या वाचकांसाठी खास हनुमान जयंतीच्या पावन दिवशी सादर करत आहोत
जय बजरंगबली
तुम रक्षक तो काहू को डर ना… जय कपिश तिहूं लोक उजागर
बुद्धी, बल, विद्या देहु मोहिं, हरहु कलेश विकार…
ही केवळ प्रार्थना नाही… ही त्या शक्तीची हाक आहे, ज्याने जन्मताच सृष्टीला आपली ओळख करून दिली.
जन्मल्याबरोबरच त्या बालकात अद्भुत शक्ती उसळत होती… आकाशात तळपणारा सूर्य पाहून हनुमानाला वाटलं हे एखादं गोड फळ आहे! क्षणाचाही विलंब न करता तो बालवीर थेट आकाशात झेपावला… देव-देवतांमध्ये खळबळ उडाली हा कोण आहे जो सूर्यालाच गिळायला निघालाय? त्या क्षणी सृष्टीला कळलं हा साधा नाही… हा आहे शक्तीचा जिवंत ज्वालामुखी.
संपादकीय
काळ पुढे सरकला… आणि रामायणाच्या रणांगणात पुन्हा एकदा इतिहास थरारला! लक्ष्मण बाणाने बेशुद्ध पडले… संपूर्ण सेना हतबल झाली… त्या अंधाऱ्या क्षणी एकच नाव आशेचा दीप बनून उभं राहिलं — हनुमान.
ना भीती, ना शंका… फक्त एकच ध्यास — प्रभू श्रीरामांची सेवा! ते उडाले… हिमालय गाठला… पण औषध ओळखता आलं नाही… मग काय? अखंड पर्वतच उचलून रणांगणात घेऊन आले. तोच तो क्षण, जो आज आपण प्रत्येक चित्रात पाहतो हनुमान डोंगर घेऊन आकाशात झेप घेताना.
लंकेच्या दरबारात रावणासमोर उभा राहिलेला हनुमान केवळ दूत नव्हता… तो होता आत्मविश्वासाचा जिवंत ज्वालामुखी. रावणाने त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, पण हनुमानाने आपल्या शेपटीचा गुंडाळा करत करत इतकं उंच आसन तयार केलं की ते थेट रावणाच्या सिंहासनापेक्षाही मोठं झालं. पुढे रावणाने त्याच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला… पण तीच आग हनुमानासाठी अस्त्र ठरली, आणि संपूर्ण लंका त्या ज्वाळांमध्ये जळून निघाली…
हनुमान म्हणजे फक्त देव नाहीत… ते आहेत संकटात उभं राहण्याची ताकद, अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आणि प्रभूवरील अखंड निष्ठा. आजच्या काळातही जर आपल्या आत “हनुमान” जागा झाला, तर कोणतंच संकट मोठं नाही…
सूर्याला फळ समजून गिळायला धावणारा तो बालवीर… आणि संजीवनीसाठी पर्वत उचलणारा तो योद्धा… तोच आपला आधार, तोच आपली ताकद…
जय हनुमान! जय बजरंगबली..
![]()

