२४ जून, मंगळवार. सकाळचे पावणेचार. बहुतेकांना वाटतं, या वेळेस फक्त कोकणातले कोंबडेच जागे असतात. पण त्या दिवशी, अलिबाग पोलिसांचं विशेष पथक जागे होते… आणि तयार होते.
गुप्त माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून खातरजमा झाली. आणि अखेर ‘लोटस लॉजिंग’वर धाड पडली.
शांततेच्या नावाखाली चालणाऱ्या त्या खोल्यांमध्ये घडत होती अमानवी व्यवहारांची तडजोड. छाप्यात दोन मुख्य आरोपींना अटक झाली – आणि एक पीडित तरुणी त्या नरकातून बाहेर काढण्यात आली.
ज्योत्स्ना झंटू दास, वय ५० – अलिबागच्या ममतानगर परिसरात राहत असली, तरी मूळची पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणांची.
राजेश रामलखन चौपाल, वय २५ – बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून थेट अलिबागमध्ये स्थायिक.
या दोघांनी ‘लोटस लॉजिंग’ नावाचं लॉजिंग भाडे तत्वावर घेतले होते. पण त्याचा उद्देश पर्यटन नव्हता, तर लक्ष्मीच्या लाचारीचा सौदा करणे हा होता.
पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, तरुणींना वेगवेगळ्या राज्यांतून फूस लावून इथे आणले जात होते. एका ग्राहकासाठी २,५०० ते ३,००० रुपयांचं ‘पॅकेज’ ठरवण्यात येत होते.
छाप्यावेळी पोलिसांनी एका पीडित २७ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. तेव्हा अशी हकीगत समोर आली की, तिच्यावर मानसिक आणि आर्थिक पातळीवर दबाव आणून देहविक्रीस भाग पाडले जात होते.
या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १४३, तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन्स, रोख रक्कम ₹२१,५००, व्यवहारासंदर्भातील नोंदी जप्त केल्या आहेत.
‘लोटस’ या शब्दाचा अर्थ आहे पवित्र कमळ. पण वरसोलीतील हे लॉजिंग मात्र ‘कमळा’सारख्या अनेक तरुण मुलींचे पावित्र्य लुटणाऱ्या विखारी व्यवसायाचा अड्डा बनला होता. भाड्याने लॉज घेतलेलं असले, तरी त्यामागे राज्यपातळीवर चालणारे एक साखळी-जाळं असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.
अटक झालेली महिला – ज्योत्स्ना दास – ही पश्चिम बंगालहून कोकणात आली होती. तिच्या मोबाइलमध्ये इतर मुलींचे फोटो, संभाषण, आणि व्यवहाराच्या नोंदी असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे ही स्त्री-तस्करीची साखळी आहे का? याचा तपास सुरू आहे.
वरसोलीतील ही कारवाई केवळ पोलिसांची यशस्वी मोहीम नव्हे, तर समाजाला हादरवणारी जागृती आहे. पर्यटनाच्या, शांततेच्या नावाखाली अशा घाणेरड्या धंद्यांना आळा घालणं हे केवळ पोलीस दलाचं नव्हे, तर प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे.
पण सरते शेवटी एक प्रश्न अनुत्तरीतच राहतो की, वरसोलीत आज जे उघड झाले, ते उद्या आपल्या शेजारील मोहल्ल्यातही होऊ शकतं का? पोलिसांनी धाड टाकली, आरोपी अटकेत आहेत, पीडितेची सुटका झाली — हे सर्व महत्वाचे आहेच. पण या काळ्या बाजारातून मुलींची खरेदी करणारे ग्राहक कोठे आहेत? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि कठोर शिक्षा होणं – हेच या कारवाईचे खऱ्या अर्थाने समाधान ठरेल.
- “अलिबागसारखं आपलं शांत आणि सुसंस्कृत शहर अशा प्रकारांमुळे बदनाम होत चाललंय. इथे येणाऱ्यांच्या चैनीच्या मागण्या विकृतीत बदलतायत, आणि आपल्या तरुणांचं भविष्य भरकटतंय. आपण फक्त वाचक राहून चालणार नाही — सजग नागरिक म्हणून आवाज उठवायलाच हवा.” :- सुमोघ घाग, स्थानिक युवक.
- “इथे मुलींचं अस्तित्व फक्त उपभोगाच्या वस्तूइतकंच राहिलंय का? अलिबागसारख्या शहरात चैनीच्या आडून जे चालतंय, ते काळजाला भिडणारं आहे. मुलींचं आयुष्य ‘पॅकेज’मध्ये विकलं जातंय आणि समाज गप्प…! ही शांतताच खरी धोकादायक आहे.” :- राज घरत, स्थानिक युवक.
- “अलिबागसारख्या सुसंस्कृत शहराचं नाव आज चैनीच्या उपभोगासाठी वापरलं जातंय, पर्यटकांचं रूपांतर दलालांत, आणि गरजूंमधून ‘वस्तू’ बनवणाऱ्यांत होत चाललंय. ही उपभोगवादी मानसिकता तरुणांना दिशाहीन करत आहे आणि समाजाचा नैतिक कणा हळूहळू ढासळतोय, हे आपण ओळखायलाच हवं.” :- यज्ञेश पाटील, युवा सामाजिक कार्यकर्ते, अलिबाग
- “फक्त पोलिसांचा छापा हा उपाय नाही, अशा धंद्यांची मुळे तिथेच रुजतात जिथं समाज गप्प बसतो. सजग नागरिकांच्या नजरेंतच खरी सुरक्षा असते. गरिबीमुळे मुलींचं आयुष्य विकलं जातं, पण अशा व्यवहारांकडे बघूनही गप्प राहणं – हाच मोठा गुन्हा आहे. बोलणं कमी, कृती जास्त हवी आजच्या समाजाला.” :- निखिल शिंदे, अलिबागकर