जिल्हाभरात आजपासून शालेय घंटानादाच्या साथीनं शैक्षणिक वर्ष २०२५–२६ ला उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्ताने विविध शाळांमध्ये “शाळा प्रवेश उत्सव” मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
नवगाव शाळेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची उपस्थिती
वगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मा. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं स्वागत विशेष जल्लोषात झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी नवख्या चिमुकल्यांच्या हस्ते फुगे आणि फुलांच्या वर्षावात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं.
त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना अभ्यास, स्वच्छता आणि स्वप्नांच्या दिशेने मेहनत घेण्याचं प्रेरणादायी आवाहन केलं. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत छानशी सेल्फी घेऊन क्षण अनमोल केला.
नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुस्तके मिळाल्यानंतर उमटलेला आनंद खरंतर शिक्षणमूल्यांचं प्रतिक ठरत होता.
मा. पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा दलाल यांनीही वेश्वि प्राथमिक शाळेत उपस्थित राहून शाळा प्रवेश कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देत, “शाळा ही केवळ शिक्षणाचेच नव्हे, तर संस्कारांचेही केंद्र आहे,” असे सांगितले.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नितेश बाळा तेलगे, सरपंच गणेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रयगड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये स्थानिक प्रशासन, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रवेशोत्सव आनंदात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. फुग्यांनी सजवलेल्या शाळा, स्वागतगीतं, लाडू-वाटप, प्रेरणादायी भाषणं अशा विविध उपक्रमांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रेमात पाडलं.